


भूत घरी आले
माझ्या लग्नानंतरची घटना- पत्नी अचानक बेशुद्ध पडू लागली. बऱ्याच वेळानंतर ती आपोआप शुद्धीवर येत असे. शुद्धीवर आल्यावर विचारल्यानंतर तिला काही सांगता येत नसे. एरवी तिच्या प्रकृतीची कसलीच तक्रार नव्हती. पत्नी धडधाकट व आरोग्य संपन्न होती. दिवसातून हा प्रकार अनेकदा घडू लागला व नंतर वाढू लागला. शेवटी तिला दुचाकीवरून माझ्या अजोळला भिवशीला रमेशकडे घेऊन गेलो. त्याच्या समोर जाऊन बसताच त्याने ही बाहेरची बाधा आहे असे म्हटले. व लगेच तिच्या अंगात त्याने ते पिशाच भरवले. त्याला बोलते ही केले. पण ओळख विचारली तर आपली ओळख ते सांगत नव्हते. नुसतेच ‘तू कशी जात होतीस!’ असे(कानडीत) गमतीचे हातवारे करून म्हणायचे. नंतर काही प्रश्नांना उत्तर देताना काही इंग्रजी शब्द ही त्याने वापरले. (पत्नीला इंग्रजीचा मुळीच गंध नव्हता हे येथे सांगितले पाहिजे) नंतर रमेशने हातात अंगारा ( भस्म) घेऊन त्या पिशाचाला( आम्हाला न सांगता) पत्नीच्या फक्त डाव्या हातात भरवले. पत्नी शुद्धीवर आली, पण तिचा डावा हात जड( बेशुद्ध) झाला! रमेशने त्या हाताची मूठ केली आणि म्हणाला, “वहिनी मूठ उघडा” पण तिला मूठ उघडता येईना ! कोपरापासूनचा हात जणू तिचा नव्हताच ! रमेश म्हणाला, “ मी पिशाच फक्त हातात भरवले आहे. मूठ उघडू शकणार नाही”. मी पत्नीला म्हटले, “ दृढसंकल्प करून मुठ उघड”. ती म्हणाली, “ मला या हाताची जाणीवच नाही. तर मूठ कशी उघडू?” नंतर रमेशने तिच्या मुठीला भस्म लावताच पत्नीने मुठ उघडली. पिशाच हातातून निघून गेले होते !
( एखादा मृतात्मा एखाद्या व्यक्तीच्या हाताचा ताबा घेऊ शकतो व त्या हाताने त्या व्यक्तीला माहीत नसलेल्या विषयावर लेखन करू शकतो, याविषयीचे उदाहरण – पर्ल क्युरन या बाईचे- माझ्या ‘विज्ञान आणि बुद्धिवाद’ या ग्रंथात दिले आहे. यालाच ऑटोमॅटिक रायटिंग- स्वयंचलित लेखन- म्हणतात.)
नंतर रमेशने ‘ हा वहिनींच्या माहेरचा मुलगा असल्याचे’ सांगितले. मी नंतर पत्नीच्या माहेरच्या गावी जाऊन तपास केला असता एक हायस्कूलमध्ये शिकत असलेला मुलगा काही दिवसापूर्वी वारला होता व त्याचे प्रेत पत्नीच्या मळ्याला जाण्याच्या रस्त्यावरच्या बाजूला असलेल्या स्मशानात दफन केले होते असे समजले. ( लिंगायत समाजात प्रेत दफन करण्याची पद्धत आहे.) पत्नी गावाबाहेर थोड्याअंतरावर असलेल्या आपल्या मळ्याला विवाहापूर्वी अधून मधून जात होती. ‘ तू कशी जात होतीस!’ ह्या पिशाचाच्या वाक्याचा व त्याच्या इंग्रजी शब्दांचा अशा रीतीने उलगडा झाला. पत्नी सुंदर होती हेच तिला त्याने ‘धरण्याचे’ कारण असावे असा मी तर्क केला.
नंतर आम्ही दुचाकीवरून परत आमच्या गावाकडे निघालो. भिवशी या गावाबाहेर आलो नाही तोच पत्नी म्हणाली, “तो बघा तो ( मुलगा) हातातील चाकू दाखवत आहे”. मी आश्चर्याने म्हणालो, “कुठे” पत्नी म्हणाली, “ समोरच”. म्हणजे पत्नीला तो पिशाच बनलेला मुलगा दुचाकीच्या समोर प्रत्यक्ष दिसत होता ! पण मला दिसत नव्हता ! शिवाय दुचाकीच्या वेगाचा त्याच्यावर परिणाम होत नव्हता ! (भिवशी गावाची हद्द ओलांडेपर्यंत तो पत्नीला दिसत होता! नंतर तो दिसेनासा झाला. हा एक आम्हाला आलेला विलक्षण अनुभव होता.( भिवशी गावाची हद्द ओलांडतेवेळी तो दुचाकीच्या उजव्याबाजुला दिसत असल्याचे पत्नीने सांगितले. पण त्यावेळीही तो हातातील चाकू उगारून दाखवत होताच, असे पत्नी म्हणाली.)
नंतर काही दिवसांनी परत पूर्वीप्रमाणेच पत्नी बेशुद्ध पडून लागली. अधून मधून हा प्रकार पूर्वीप्रमाणेच घडू लागल्यामुळे मी पत्नीला घेऊन पुन्हा रमेशकडे गेलो. रमेश घरी नव्हता म्हणून आम्ही माझ्या मामाच्या घरी गेलो. थोड्यावेळाने रमेशला आम्ही आलो आहोत हे कळताच आम्हाला भेटायला मामाच्या घरीच आला.( मामाच्या घराला लागूनच रमेशचे म्हणजे आमच्या चुलत मामांचे घर आहे) त्यावेळी आम्ही स्वयंपाक घरात होतो. तेथेच त्याने पत्नीच्या अंगात पिशाच भरवले व स्वयंपाक घरातील चुलीतील राख घेऊन म्हणाला,” ही चुलीतील साधी राख आहे” असे म्हणून त्याने ती तिच्या अंगावर टाकली त्याबरोबर पत्नी शुद्धीवर आली ! पिशाच निघून गेले ! हा प्रयोग रमेशने मुद्दाम केला होता. कारण तीच राख ‘भस्म’ म्हणून मला त्याने दिली व जेव्हा पत्नी बेशुद्ध पडेल तेव्हा थोडे हे भस्म तिच्या अंगावर अशाच रीतीने टाकण्यास मला सांगितले. यानंतर थोड्यावेळाने पत्नी पिशाच अंगात भरल्याप्रमाणे वागू लागली. रमेश लगेच एका व्यक्तीचे नाव घेऊन म्हणाला, “xx तू इथे आलास होय! थांब” असे म्हणून रमेशने पुन्हा चुलीतील राख घेऊन पत्नीच्या अंगावर टाकली. त्याबरोबर पत्नी परत शुद्धीवर आली. ‘काही दिवसापूर्वी भिवशी तील xx हा माणूस मेला असून तो वहिनीच्या अंगात आता आला होता’ असे रमेशने आम्हास सांगितले. सुंदर तरुण स्त्री ही पुरुष पिशाचाला आकृष्ट करीत असावी हा माझा तर्क बरोबर असल्याची माझी या दुसऱ्या घटनेमुळे खात्रीच झाली.
यानंतरही पत्नीचे अजून मधून बेशुद्ध पडणे चालूच होते, पण रमेशने दिलेले ‘भस्म’( अर्थात माझ्या मामाच्या घरची चुलीतील राख !) अंगावर टाकतात ती ताबडतोब शुद्धीवर येत असे ! याविषयी मी एक प्रयोग करण्याचे ठरवले. पत्नी बेशुद्ध पडतात मी चिमटीतील भस्माचे काही कण चार फूट उंचीच्या अंतरावरुन तिच्या शरीरावर सोडले. आश्चर्य म्हणजे तेवढ्या कणांनी ही ती शुद्धीवर येत असे ! किंबहुना ती शुद्धीवर आल्यामुळेच ते कण तिच्या शरीरावर पडले असे मला समजावे लागत होते! कारण डोळ्यांना ते कण दिसतच नव्हते ! कणाकणात भगवान असल्याचा हा रोकडा अनुभव होता ! मात्र त्या कणांना रमेश सारख्या अतिंद्रिय (दैवी) शक्ती प्राप्त झालेल्या व्यक्तीचा पूर्वस्पर्श किंवा ‘भावना’ झाली असली पाहिजे ! तरच त्या कणातील अप्रकट आत्मा प्रकट होऊन त्याला आज्ञा केलेले कार्य ते कण करू शकतात ! अशा रीतीने जड (निर्जीव) वस्तूचे अस्तित्व व कार्य चेतनावर – आत्म तत्त्वावर – अवलंबून असल्याच्या क्वाँटम सिद्धांताच्या सत्यतेचा हा साक्षात प्रायोगिक पुरावा मला अनुभवयास मिळाला ! त्यानंतर पत्नीचे बेशुद्ध पडण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत जाऊन शेवटी पूर्ण बंद झाले. मनुष्याचे शरीर नष्ट झाले तरी मनुष्य आत्मस्वरूपात अस्तित्वात असतो. वासना देहाने तो फिरत असतो. तरुण वयात शरीर सोडावे लागले तर तो वासनादेहाने एखाद्या सुंदर तरुण स्त्रीला झपाटू शकतो. तसेच मृतात्म्यावर दैवी शक्ती प्राप्त झालेली व्यक्ती अधिकार चालवू शकते, या गोष्टी या प्रकरणाने सिद्ध होतात.
दैवी संचार भूत घरी आले प्रार्थनेला श्रीस्वामीसमर्थ पावले कालभेद खरा आहे काय वैश्विक नाटकाबद्दलचा नाडी ग्रंथांचा दाखला

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.