
E Book 203 बोध अंधश्रद्धेचा ४ . पान १७६ ते १८४ पर्यंत परि ४- १४ ते १६ या इथे ‘नाडी भविष्य’ कर्ते महर्षी हे ‘रिंग मास्टर’ आहेत. भविष्याच्या आसूडाला तो ‘थोतांड’ म्हणून आव्हान देऊन आपण रिंगणात उतरला आहात. वर्तमानपत्रांतून परिपत्रके व लेख लिहून व मला मध्ये घालून “पहा या रिंग मास्टरची कशी ‘ऐशी की तैशी करतो’ नाही तर ५ लाख देतो, असे डरकाळ्या फोडणारे आवाज आपण वेळोवेळी करता. आपण स्वतः हजर न राहण्याचा पळपुटेपणा केला असताना तुमच्या अपरोक्ष मी सभेत ‘वाद घालायला’ गेलो हा (ओकांचा) ‘पळपुटेपणा’ म्हणण्याचा साळसूदपणा आपली बुद्धी चक्रम झाल्याचे द्योतक आहे असे दुःखाने म्हणावे लागते. ..
आपल्या पत्रातील वरील अवतरणांवरून हे स्पष्ट आहे की आपण स्वतःला नाडीभविष्याचा खरेखोटपणा ठरवणारे न्यायाधीश समजता, व नाडीभविष्याच्या केसला ‘प्रायमा फेसी’ वाजवीपणा नाही असा निकाल देऊन ती फेटाळून लावता, नव्हे नाडीभविष्याला इस्पितळातील वेड्यांची बडबड ठरवले. वास्तविक श्री. ओकांनी नाडीभविष्याची सत्यासत्यता वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे न्यायाधीश बनून आपण ठरवावी असे आपल्याला सांगितले नाही. तर “या भविष्याचा अनुभव घ्यायला नाडीकेंद्रात यावे. मी माझ्या बाजूने मदत करण्याचे आश्वासन देतो.” (त्यांचे पत्र दि. १९-११- ९५) अशी आपल्या पत्राद्वारे त्यांनी विनंती केली आहे व मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यांना आपले नाडीभविष्याविषयी काय मत असणार याची ‘पैलतीर’ मधील माझ्या लेखनावर आपण केलेल्या टीकेवरून आधीच कल्पना होती हे खरे आहे. तरीही त्यांना ही विनंती आपल्याला केली याचे कारण आपण “विज्ञानामध्ये सत्यशोधनासाठी जी पद्धत वापरण्यात येते त्या पद्धतीचा अवलंब केल्यावाचून जीवनाच्या कोणत्याही अंगाबद्दल सत्यज्ञान होऊ शकत नाही. व या पद्धतीव्यतिरिक्त एखादी पद्धती वापरून झालेले ज्ञान सत्य आहे असे समजणे ही अंधश्रद्धा आहे असे मानणारा वाद म्हणजे विवेकवाद” अशी विवेकवादाची व्याख्या आपल्याला ‘विवेकवाद’ या ग्रंथात केली असल्याचे त्यांनी ‘पैलतीर’ १९९५ मधील माझ्या ‘विवेकवाद व गूढानुभूतिवाद’ या लेखात वाचले व आपण ‘विवेकवादी’ आहात याचा अर्थ वरील आपल्या व्याख्येप्रमाणे आपण ‘विज्ञानवादी’ ही आहात, अंधश्रद्ध नाहीत, असे समजून त्यांनी वरील प्रमाणे नाडीभविष्याचे सत्य अनुभवाच्या कसोटीवर तपासून पाहण्यासाठी मद्रासमधील नाडीकेंद्रात यायची विनंती आपल्याला केली.
आता नाडीभविष्यकथन व भविष्य जाणून घेण्याची इच्छा हे मानवी जीवनाचे अंग नाही असे आपण म्हणू शकणार नाही. भविष्य जाणण्याची इच्छा नसणारा माणूस या प्रपंचात आढळणे कठीण आहे. अशा रीतीने भविष्यकथन व श्रवण हे मानवी जीवनाचे एक अंग बनलेले असल्याने त्यात सत्य किती ती अंधश्रद्धा किती हे विज्ञानाच्या पद्धतीचा अवलंब करूनच ठरवले पाहिजे हे उघड आहे नव्हे, तसा आपला आग्रह आहे. विज्ञानाची पद्धती अवलंबणे म्हणजे नाडीभविष्यकथनाचा कितपत पडताळा येतो हे प्रत्यक्ष अनुभवाने तपासून पाहणे होय; ही किमान वैज्ञानिक अपेक्षा आहे. पण असा पडताळा पाहण्याची नाडीभविष्याच्या बाबतीत जरुरीच नाही, कारण ती ‘प्रायमा फेसी’ वाजवी केसच नाही असे आपण ठरवतो ते कशाच्या आधारे? त्यासाठी कोणती वैज्ञानिक पद्धती आपण अवलंबली? केवळ आपण तसे म्हणता म्हणून ती ‘प्रायमा फेसी’ वाजवी केस नाही असे समजायचे काय? जे रूढ विज्ञानात बसत नाही ते सर्व वेड्यांच्या इस्पितळातील एखाद्या माथेफिरूची बडबड समजायचे काय?
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.